एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारचा रिमोट शिवसेनेकडे नाही, असा दावा माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी केला आहे. तसेच, हा रिमोट कोणाकडे आहे हे सर्वांना माहीती आहे, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले आहे. दरम्यान, काँग्रेसलाही विखेंनी सत्तेबाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, सरकारमध्ये कॉंग्रेस पक्षाचे अस्तित्वच नाही, तर मंत्र्यांचे कुठे दिसणार? असा प्रश्न उपस्थित करून, कॉंग्रेस पक्षाने आता इशारे देण्याचे काम सोडून द्यावे, एवढी लाचारी पत्करुन सरकारमध्ये राहण्याची वेळ कॉंग्रेस पक्षावर आली असेल तर त्यांनी सरळ सत्तेतून बाहेर पडले पाहिजे आणि आपली स्वत:ची ताकद दाखवून दिली पाहिजे, असा सल्ला आ.विखे यांनी दिला आहे.
आ.विखे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना शिवजयंतीच्यानिमित्ताने महाविकास आघाडी सरकारने केलेल्या नियमावलीवर सडकून टीका केली. राज्यात मंत्र्यांचे दौरे मोकाटपणे सुरु आहेत, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या पदभार सोहळ्यालाही गर्दी झालेली चालते. तिथे मात्र कोणतेही नियम नाहीत. पण महाविकास आघाडी सरकारने शिवजयंतीसाठी नियमावली तयार करुन एक प्रकारे राज्याच्या अस्मितेलाच धक्का देण्याचे काम केले असून, ज्यांच्या आशिर्वादाने आणि ज्यांचे नाव घेवून महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले, त्या आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला मात्र नियमावली तयार होते, हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय धक्कादायक आणि चीड आणणारी बाब आहे. सरकारने तात्काळ ही नियमावली मागे घेवून राज्यातील जनतेला शिवजयंती साजरी करु द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. शिवजयंतीच्या निमित्ताने महाविकास आघाडी सरकारने केलेले नियम हे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का पोहचविणारे आहेत. सरकारने फार प्रतिष्ठेचा विषय न करता ही नियमावली तातडीने मागे घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
'त्या' मंत्र्याची चौकशी करा
मंत्रिमंडळातील अन्य एका मंत्र्याबद्दल समोर आलेल्या एका घटनेवर भाष्य करताना आ. विखे म्हणाले की, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंच्याबाबतीत चौकशीअगोदरच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्षाध्यक्षांनी क्लीन चीट देऊन त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे, त्याची चौकशी आता सुरु आहे, काय बाहेर येईल हे माहीत नाही. परंतू आता नव्याने पूजा चव्हाण या युवतीच्या आत्महत्येबाबत शिवसेनेच्या एका ज्येष्ठ मंत्र्याचे नाव समोर आले आहे. त्याच्या ऑडीओ क्लिप्स राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे भारतीय जनता पक्षाने दिल्या आहेत. प्रसार माध्यमांनीही त्या दाखविल्या आहेत. अशा बेजबाबदार मंत्र्यांना मंत्रिमंडळात ठेवता कशाला? असा प्रश्न करुन विखे म्हणाले, या घटनेच्या चौकशीबाबत विरोधी समर्थन राष्ट्रवादी कॉंग्रेसची काही नेतेमंडळी करीत आहेत, ही बाब महाराष्ट्राच्या दृष्टीने शोभनीय नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सत्तेत राहण्यासाठी किती तडजोडी करायच्या, हे आता ठरविले पाहिजे. महाविकास आघाडी सरकारने राज्याच्या अस्मितेची लक्तरे वेशीला टांगलेली रोजच जनता पाहत आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात दोषी असलेल्या मंत्र्याचा तात्काळ राजीनामा घेवून चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणात सरकार मंत्र्यांना पाठीशी घालतंय का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
दहशतीने 'ती' वसुली
राज्यातील शेतक-यांकडून दहशतीने सुरु असलेली विज बिलांची वसुली चीड निर्माण करणारी असून, ग्रामीण आणि शहरी भागात विज वितरण कंपनीने विज तोडणीचे महान काम या सरकारने सुरु केल आहे, याबद्दल नाराजी व्यक्त करुन आ.विखे यांनी सांगितले की, राज्यातील शेतकरी अगोदरच अडचणीत सापडले आहेत. त्यांना दिलासा देण्याची गरज असताना मात्र आघाडी सरकारने वीज तोडणीच्या नोटिसा काढून शेतक-यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी लोकप्रियता मिळविण्यासाठी १०० युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. तुमच्याकडे काय कोणी मागायला आले नव्हते. मोफत वीज तर सोडाच पण धाकदपटशाही आणि दहशतीने सरकारने सुरु केलेली ही वसुली सरकारने तातडीने थांबवावी, अशी मागणी आ.विखे यांनी केली. सरकारने ही वसूली तात्काळ थांबविली नाही तर शेतक-यांच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, कॉंग्रेस पक्षाचे अस्तित्वच या सरकारमध्ये कुठेच दिसत नाही, त्यामुळे कॉंग्रेसने अनेक वेळा इशारे देवूनही त्यांच्या इशा-याची चिंता सरकारमध्ये कोणीही करत नाही. कॉंग्रेसचे मागील प्रदेशाध्यक्ष सरकारबद्दल एका शब्दानेही बोलले नाहीत. नवीन प्रदेशाध्यक्ष काय करतात हे माहिती नाही. पण लाचारी पत्करुन सत्तेत राहण्यापेक्षा बाहेर पडून आपली ताकद दाखवा, असा सल्लाही त्यांनी कॉंग्रेसला दिला.
Post a Comment